Beed News | बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार सभेवर करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी जोरदार टीका केली आहे. या सभेला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. शर्मा यांनी या नेत्यांवर राजकीय स्वार्थासाठी सभा घेतल्याचा आरोप करत, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
‘लोकांची ताटं हिरावली, आता समाजाला काय न्याय देणार?’
करूणा शर्मा यांनी बीडमधील सभेला ‘राजकीय पोळी भाजण्याचा’ प्रकार म्हटले आहे. हे नेते समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. “आमच्या ताटातलं घेऊ नका म्हणता, पण तुम्ही मंत्री असताना लोकांची ताटं हिरावून घेतली,” असा थेट हल्ला त्यांनी चढवला. तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, असा आरोपही त्यांनी केला.
धनंजय मुंडे यांनी ‘जीआर कळतो का?’ असा सवाल इतरांना विचारण्यावरही शर्मा यांनी टीका केली. “त्यांना स्वतःला जीआर कळतो का?” असा प्रतिसवाल त्यांनी केला. धनंजय मुंडेंविरोधात मी उभी राहिले होते, पण माझा अर्ज रद्द केला गेला; अन्यथा कोण किती पाण्यात आहे हे तेव्हाच कळले असते, असेही त्या म्हणाल्या. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत समाजाचे खच्चीकरण होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Beed News | ड्रायव्हरचा मर्डर :
शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. “जो स्वतःच्या बायकोला न्याय देऊ शकला नाही, तो समाजाला काय न्याय देणार?” असे त्या म्हणाल्या. “माझी आई मनोरमा शर्मा (Manorama Sharma) आणि माझा ड्रायव्हर यांचे मर्डर केले. माझ्या बहिणीवर बलात्कार केला. माझ्या आईने यांच्या दबावाखाली आत्महत्या केली,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
“वाल्मिक कराडने (Valmik Karad) मला जिल्हाधिकारी कार्यालयातच मारहाण केली, हे सर्वांना माहीत आहे. माझ्यावर खोट्या केसेस टाकल्या,” असेही त्या म्हणाल्या. आपण चार-पाच दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेऊन न्याय मागितला, पण त्यांनी ‘घरगुती मॅटरमध्ये पडत नाही’ असे सांगितल्याचेही शर्मा यांनी उघड केले. आपली बहीण सध्या इंदूरला (Indore) असून, तिला पाठिंबा मिळाल्यास ती सुद्धा बोलेल, असेही त्या म्हणाल्या.






