Jejuri Accident | पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ सोमवारी सकाळी अत्यंत भीषण अपघात (Jejuri Accident) घडला. भरधाव टेम्पो वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 ते 16 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे वारीत शोककळा पसरली असून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
सासवडे गावाजवळ घडली भीषण दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. जेजुरीजवळील सासवडे गावाच्या परिसरात वारकरी दिंडीसह चालत असताना अचानक एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला टेम्पो थेट दिंडीत घुसल्याने अनेक वारकरी त्याच्या धडकेत सापडले. धडकेची तीव्रता इतकी होती की अनेकजण रस्त्यावर फेकले गेले.
तिघांचा जागीच मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अनेक वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्याचे कामही सुरू करण्यात आले. टेम्पो अचानक अनियंत्रित कसा झाला, चालकाचा निष्काळजीपणा होता की वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
आषाढी वारी हा लाखो भाविकांच्या श्रद्धेचा सोहळा मानला जातो. मात्र, या दुर्दैवी दुर्घटनेमुळे संपूर्ण वारीवर शोककळा पसरली आहे. जखमींवर उपचार सुरू असून या घटनेने वारकरी आणि भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
News Title: Jejuri Accident News Saswad Wari 3 female warkaris died






