IPL 2027 | इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 हंगाम संपून अवघे काही दिवस झाले असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील पर्वाच्या तयारीला वेग दिला आहे. आयपीएलच्या 20 व्या हंगामाचे वेळापत्रक, कालावधी आणि सामन्यांची संख्या याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाली असून स्पर्धा नेहमीपेक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत बीसीसीआयची तयारी :
आयपीएल 2027 स्पर्धेचे आयोजन 10 मार्च ते 15 मे या कालावधीत करण्याचा बीसीसीआयचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या हवामानातील बदल आणि उन्हाळ्यातील वाढता उकाडा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या मते, मे महिन्याच्या उत्तरार्धात देशातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवत असल्याने खेळाडूंना अधिक अनुकूल वातावरण मिळावे, हा यामागील उद्देश आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devajit Saikia) यांनी सांगितले की, स्पर्धा लवकर सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यानुसार, आयपीएल 2027 चे सामने 10 मार्चपासून सुरू करून 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. यंदाच्या हंगामात स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात झाली होती, तर अंतिम सामना 31 मे रोजी खेळवण्यात आला होता. त्यामुळे पुढील हंगामाचे वेळापत्रक जवळपास तीन आठवडे पुढे आणण्याची शक्यता आहे.
IPL 2027 | सामन्यांच्या संख्येवर बीसीसीआयचा निर्णय :
आयपीएल 2027 मध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. काही अहवालांमध्ये 20 व्या पर्वात तब्बल 94 सामने खेळवले जाऊ शकतात, असा दावा करण्यात आला होता. मात्र, बीसीसीआयने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, सध्या तरी स्पर्धेतील सामन्यांची संख्या वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव बीसीसीआयसमोर नाही. त्यामुळे आगामी हंगामातही यंदाप्रमाणेच एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेला अजून सुमारे आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने पुढील काही महिन्यांत विविध फ्रेंचायझींमध्ये खेळाडू, व्यवस्थापन आणि रणनीतीसंदर्भात अनेक घडामोडी पाहायला मिळू शकतात.






