Pune Murder Case | पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एक थरारक खून प्रकरण उघडकीस आलं आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीचा खून करून तिचा मृतदेह लोखंडी भट्टीत जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिक भयावह म्हणजे हा खून करण्यामागे पतीनं ‘दृश्यम’ (Drishyam) चित्रपटातून प्रेरणा घेतल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. खून करून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत पतीनं स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या सीसीटीव्ही तपासात त्याचं बिंग फुटलं. (Pune Murder Case)
चारित्र्याच्या संशयातून ‘दृश्यम’सारखी आखली योजना :
या प्रकरणातील आरोपीचे नाव समीर जाधव (Samir Jadhav), तर मृत पत्नीचे नाव अंजली जाधव असं आहे. समीर हा अमरावतीचा रहिवासी असून पुण्यात फॅब्रिकेशनचे काम करतो, तर पत्नी एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. या दांपत्याला दोन मुले आहेत आणि २०१७ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद होत असल्यानं समीरनं आपल्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला.
आरोपी स्वतःच एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवत होता, तरीही पत्नीवर संशय घेत असे. अंजलीच्या एका पुरुष मित्राला “I Love You” असा मेसेज पाठवून त्यानं स्वतःच वादाला सुरुवात केली. या घटनेनंतर दोघांमध्ये तणाव वाढला आणि अखेर समीरनं पत्नीचा “काटा काढण्याचा” निर्णय घेतला.
Pune Murder Case | भट्टीत जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न :
मुलं दिवाळीच्या सुट्टीत गावी गेल्यानंतर समीरनं हत्या करण्याची योजना अमलात आणली. खेड शिवापूरजवळील गोगलवाडी भागात त्यानं एक गोडाऊन भाड्याने घेतलं आणि २६ ऑक्टोबर रोजी पत्नीला तिथं “जागा दाखवण्याच्या” बहाण्याने नेलं. तिथं पोहोचताच त्यानं अंजलीचा गळा दाबून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं तयार केलेल्या लोखंडी भट्टीत तिला जाळलं आणि नंतर तिची राख नदीत फेकून दिली.
खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीरनं पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचं लक्षात आलं. घटनास्थळी जमा केलेल्या पुराव्यांच्या आधारे आणि चौकशीदरम्यान अखेर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी समीर जाधवला अटक केली असून, या प्रकरणात पूर्वनियोजित हत्या, पुरावे नष्ट करणे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






