Pune Weather Update | पुणे जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पालघर (Palghar) जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, प्रशासन सतर्क :
मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि संपूर्ण कोकण (Konkan) पट्ट्यात जोरदार पावसाची नोंद होत आहे. सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करत पुढील काही तासांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, विनाकारण बाहेर पडणे किंवा प्रवास टाळावा तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना पाळाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
Pune Weather Update | पालघरमध्ये पूरस्थिती, शाळांना सुट्टी :
दरम्यान, पालघर (Palghar) जिल्ह्यात सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भाग जलमय झाले आहेत. पश्चिम किनारपट्टीवरील भागांना सर्वाधिक फटका बसला असून डहाणू (Dahanu) शहरातील दुकाने आणि सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. तलासरी (Talasari) तालुक्यातही अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Ahmedabad National Highway) वरील चारोटी ते डहाणू मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच वाणगाव (Vangaon) ते चिंचणी (Chinchani) मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
प्रशासनाने इशारा दिला आहे की, पावसाचा जोर कायम राहिल्यास धामणी धरण (Dhamani Dam) येथील तीन दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सूर्या (Surya River) आणि वैतरणा (Vaitarna River) नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.






