Heavy Rain Alert | राज्यासह संपूर्ण देशात हवामानाचा लहरीपणा सातत्याने वाढताना दिसत आहे. कुठे कडाक्याची थंडी तर कुठे मुसळधार पाऊस अशी विचित्र स्थिती सध्या अनुभवायला मिळत आहे. मॉन्सून संपून अनेक महिने उलटले असले तरीही पावसाने अजूनही माघार घेतलेली नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक भागांसाठी जोरदार पावसाचा आणि थंडीचा थेट इशारा दिला आहे. (Today Maharashtra Temperature)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात मोठी घट झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाने नवे नीचांकी स्तर गाठले आहेत. ऐन नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजीही काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Heavy Rain Alert)
महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, तापमानात मोठी घसरण :
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून येथे तापमान थेट 6.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. धुळे जिल्ह्यात 6.6 अंश सेल्सिअस, निफाडमध्ये 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. याशिवाय यवतमाळ, अहिल्यानगर, गोंदिया आणि नागपूर येथेही तापमान 9 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस परभणी, निफाड आणि धुळे जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याची दाट शक्यता आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Cold Wave Maharashtra)
Heavy Rain Alert | देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. नवीन पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे हवामानात मोठा बदल झाला असून उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट आणि मुझफ्फराबाद येथे 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
31 डिसेंबरच्या रात्री पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता असून, पूर्व उत्तर प्रदेशात 1 जानेवारी 2026 पर्यंत धुक्याचे प्रमाण हळूहळू कमी होण्याची अपेक्षा आहे. याच कालावधीत राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकूणच देशात कुठे कडाक्याची थंडी तर कुठे सततचा पाऊस आणि काही शहरांमध्ये वाढलेले प्रदूषण अशी मिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे.






