Kalyan Dombivli Municipal Election | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक ठिकाणी जोरदार राजकीय हालचाली झाल्या, तर काही ठिकाणी मतदानाआधीच निकाल स्पष्ट झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतदान होण्याआधीच विजयाचे खाते उघडले असून दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. (KDMC Election 2026)
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या रेखा राजन चौधरी (Rekha Chaudhari) आणि आसावरी केदार नवरे यांनी कोणताही सामना न करता विजय मिळवला आहे. मतदानाआधीच या दोन्ही जागांवर भाजपचे ‘कमळ’ फुलल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
प्रभाग १८ (अ) आणि पॅनल २६ (क) मधून बिनविरोध निवड :
प्रभाग क्रमांक १८ (अ) मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज भरण्याच्या अंतिम वेळेपर्यंत त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याची माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली आहे. (Kalyan Dombivli Municipal Election Result)
त्याचप्रमाणे पॅनल क्रमांक २६ (क) मधून खुल्या प्रवर्गातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी केदार नवरे (Aasawari nawre) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधातही कोणताही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे भाजपने कल्याण-डोंबिवली महापालिकेत मतदानाआधीच दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Kalyan Dombivli Municipal Election | भाजपसाठी महत्त्वाचा विजय, प्रदेशाध्यक्षांच्या प्रयत्नांना यश :
रेखा चौधरी या यापूर्वीही नगरसेविका राहिल्या असून ही त्यांची दुसरी टर्म आहे, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच निवडणूक असून पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून भाजप महिला मोर्चाच्या कल्याण विभागाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपकडून त्यांच्या विजयाला हिंदुत्वाचा पहिला विजय म्हणून संबोधले जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना या बिनविरोध निवडीमुळे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आता २ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार असून १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला एकाच दिवशी सर्व महानगरपालिकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच कल्याण-डोंबिवलीत भाजपने विजयाची सुरुवात केल्याने निवडणुकीचे वातावरण अधिक तापले आहे.






