Mumbai Electricity Bill | वाढत्या उष्णतेमुळे घराघरात पंखे, एसी आणि कुलरचा वापर वाढतो आणि त्याचबरोबर विजेच्या बिलाची चिंता देखील वाढते. मात्र याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Maharashtra Electricity Regulatory Commission (MERC) ने वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून 1 एप्रिल 2026 पासून नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. (MERC Electricity Rates)
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या BEST Undertaking, Tata Power आणि Adani Electricity Mumbai Limited या तिन्ही कंपन्यांच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विविध वापर श्रेणीतील ग्राहकांच्या वीज बिलात लक्षणीय घट होणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचा थेट फायदा मे महिन्यात येणाऱ्या वीज बिलामध्ये दिसून येणार आहे. (Mumbai Electricity Bill)
नवीन वीज दर कसे असतील? :
नवीन दरपत्रकानुसार 0 ते 100 युनिट वापरासाठी BEST ग्राहकांना प्रति युनिट ₹3.84, टाटा पॉवर ग्राहकांना ₹4.70 आणि अदानी ग्राहकांना ₹4.93 दराने वीज मिळणार आहे. 101 ते 300 युनिट वापरासाठी BEST चा दर ₹7.17, टाटा पॉवरचा ₹7.10 आणि अदानीचा ₹8.13 प्रति युनिट असणार आहे.
301 ते 500 युनिट वापरासाठी BEST चा दर ₹11.85, टाटा पॉवरचा ₹11.64 तर अदानीचा ₹9.38 प्रति युनिट निश्चित करण्यात आला आहे. 500 पेक्षा जास्त वापरासाठी BEST साठी ₹13.07, टाटा पॉवरसाठी ₹12.64 आणि अदानीसाठी ₹10.63 प्रति युनिट दर लागू होणार आहेत.
Mumbai Electricity Bill | ग्राहकांना किती बचत होणार? :
नवीन दरांमुळे विविध स्तरांवरील ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. 0 ते 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा पॉवरच्या दरात सुमारे 9.7 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. 101 ते 300 युनिट वापर करणाऱ्या मध्यमवर्गीय ग्राहकांना जवळपास 10.8 टक्क्यांपर्यंत दिलासा मिळणार आहे.
301 ते 500 आणि त्यापेक्षा जास्त युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी तब्बल 14 टक्क्यांपर्यंत दरकपात करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज वापरणाऱ्या कुटुंबांना याचा अधिक फायदा होणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात वीज दरातील ही घट सर्वसामान्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. (Mumbai Electricity Bill)
मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रातील ग्राहकांसाठीही दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या ग्राहकांसाठीही 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या आराखड्यानुसार दरवर्षी टप्प्याटप्प्याने वीज दर कमी करण्याची योजना आखण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत कोणत्याही प्रवर्गातील वीज दर वाढवले जाणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.






