Eknath Shinde | शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा करत लाभार्थी महिलांचे टेन्शन दूर केले. “कोणी आल तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही,” असा ठाम शब्द त्यांनी सभेत दिला.
मुंबईतील नेस्को सेंटर येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी महायुती सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना ही आपल्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगत, या योजनेचा लाभ पात्र महिलांना यापुढेही नियमितपणे मिळत राहील, असे स्पष्ट केले.
“आई-बहिणींची काटकसर पाहिली, म्हणून योजना सुरू केली” :
लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी माझ्या आईची आणि बहिणीची काटकसर जवळून पाहिली आहे. महिलांना आर्थिक आधार मिळावा, त्यांचा सन्मान वाढावा आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.”
ते पुढे म्हणाले, “या योजनेत अनेकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना योग्य उत्तर दिले.”
महायुतीत कोणताही वाद नाही :
महायुती सरकारबाबत विरोधकांकडून सुरू असलेल्या चर्चांवरही शिंदे यांनी भाष्य केले. “माझ्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नसून जनतेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हा आहे,” असे त्यांनी सांगितले.
शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी आणि वारकरी यांचे जीवन अधिक सुखी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Eknath Shinde | कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचा दावा :
आपल्या भाषणात शिंदे यांनी पक्षात घराणेशाहीला स्थान नसल्याचा दावा केला. “माझ्याकडे वशिला चालत नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे,” असे सांगत त्यांनी राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना संधी दिल्याचा उल्लेख केला.
लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान शिंदे यांच्या या घोषणेमुळे लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.






