Amit Shah | “श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या शौर्याचा इतिहास अजरामर आहे. त्यांनी 20 वर्षांत 41 युद्धं लढून एकही हरलं नाही. त्यांच्या स्मारकासाठी एनडीए सारखी पवित्र आणि प्रेरणादायी जागा दुसरी कुठली असू शकत नाही,” असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
“एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो, हे सावरकरांनी दाखवून दिलं” :
अमित शाह (Amit Shah) म्हणाले, “पुण्याची भूमी ही स्वराज्याच्या संस्कारांची उगमभूमी आहे. इथेच टिळकांनी इंग्रजांविरुद्ध सिंहगर्जना केली, आणि सावरकरांनी देशासाठी बलिदानाचा आदर्श घालून दिला. आज भारताच्या सीमेवर कोणी नजर टाकायची हिंमत करत नाही, यामागे स्वराज्याच्या परंपरेचा प्रेरणादायी वारसा आहे.”
“बाजीराव पेशव्यांना 19 व्या वर्षी शाहू महाराजांनी सेनापती म्हणून निवडलं आणि पुढील 20 वर्षांत त्यांनी 41 युद्धं जिंकली. पावसाळ्यात युद्ध न होतानाही, दर 8 महिन्यांत दोन युद्धं लढून विजय मिळवणं हे सामान्य गोष्ट नव्हती. ही व्यूहरचना, त्वरा, समर्पण आणि बलिदानाची पराकाष्ठा होती,” असं अमित शाह यांनी नमूद केलं.
Amit Shah | “एनडीए ही केवळ प्रशिक्षण संस्था नाही, ती भारताच्या सुरक्षेचं अधिष्ठान आहे” :
“जेव्हा एनडीएची स्थापना झाली, तेव्हा इंग्रजांना कदाचित याची कल्पनाही नसेल की पुढील शतकभर भारताच्या सीमांचे रक्षण करणारे जवान इथून तयार होतील. त्यामुळेच बाजीराव पेशव्यांचं स्मारक याठिकाणी उभारणं हे राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक ठरेल,” अशा शब्दांत अमित शाह यांनी भावनिक संदेश दिला.






