Ajinkya Rahane | भारतीय क्रिकेटमधील शांत, संयमी आणि विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. दीर्घ काळ भारतीय संघापासून दूर राहिल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटच्या एका महत्त्वपूर्ण पर्वाचा शेवट झाल्याची भावना चाहत्यांमध्ये व्यक्त होत आहे.
ऐतिहासिक नेतृत्वाची कायम आठवण :
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अनुपस्थित असताना अजिंक्य रहाणेने संघाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) जिंकत नवा इतिहास रचला होता. संयमी स्वभाव, संकटात धावून येणारी फलंदाजी आणि नेतृत्वगुण यामुळे त्याने भारतीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.
मात्र गेल्या काही वर्षांत खराब फॉर्म, वाढती स्पर्धा आणि नव्या खेळाडूंना मिळालेल्या संधी यामुळे रहाणेला भारतीय संघात सातत्याने स्थान मिळू शकले नाही. बराच काळ संघाबाहेर राहिल्यानंतर अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा निरोप देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या उल्लेखनीय कारकिर्दीला सलाम करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Ajinkya Rahane | भावनिक संदेशातून व्यक्त केल्या भावना :
इन्स्टाग्राम (Instagram) वर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे रहाणेने निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. आपल्या संदेशात तो म्हणाला की, प्रत्येक प्रवासाला सुरुवात असते तसेच शेवटही असतो आणि योग्य वेळ आल्यावर त्या क्षणाचा स्वीकार करणे आवश्यक असते.
तसेच फलंदाज म्हणून मी नेहमी टायमिंगवर विश्वास ठेवला असून आंतरराष्ट्रीय आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याची भावना त्याने व्यक्त केली.






