Who Is Madhavi Jadhav | नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान झालेल्या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात न घेतल्याने वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी थेट कार्यक्रमस्थळी आक्षेप घेत गोंधळ घातला. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत पाठिंबा दर्शवला आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. (Who Is Madhavi Jadhav)
नेमकं प्रकरण काय घडलं? :
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी त्यावर आक्षेप घेतला. या दोघींनी कार्यक्रम सुरु असतानाच गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले. घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी करत महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माधवी जाधव म्हणाल्या की, बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं असून त्यांच्या नावाचा उल्लेख न करणं ही गंभीर चूक आहे. मला निलंबित केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला कोणतेही काम दिले तरी मी करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सामाजिक संघटनांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
Who Is Madhavi Jadhav | कोण आहेत माधवी जाधव? :
माधवी जाधव या शासकीय सेवेत असून त्या वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. 2011 साली त्यांची वन विभागात भरती झाली होती आणि सध्या त्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कार्यरत आहेत. शासकीय कर्मचारी असूनही सामाजिक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडण्यामुळे त्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत माझा आदर सर्वश्रुत आहे. त्यांच्या जयंतीसाठी मी नेहमी पुढाकार घेतो आणि समाजाच्या विविध घटकांसाठी काम करतो. अनवधानाने बाबासाहेबांचे नाव राहिले असेल, पण त्यासाठी एवढा गोंधळ का माजवला जात आहे, हे मला समजत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मात्र, या घटनेमुळे नाशिकसह राज्यभरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






