Varandha Ghat Closed | पुणे आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाचा डोंगरी मार्ग असलेला वरंधा घाट आता काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रस्त्याच्या दुरुस्ती आणि विकास कामांमुळे हा घाट 30 एप्रिल 2026 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुणे ते कोकण प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील भोरपासून सुरू होणारा आणि रायगड जिल्ह्यातील महाडपर्यंत जाणारा हा घाट मार्ग पुणे-कोकण प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र सध्या सुरू असलेल्या रस्ते सुधारणा कामांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Varandha Ghat Closed)
रस्ते दुरुस्तीमुळे वाहतुकीवर पूर्ण बंदी :
जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार 25 मार्चपासून या मार्गावर ‘नो एंट्री’ लागू करण्यात आली आहे. हिरडोशी ते वरंधा घाट दरम्यान मोठ्या प्रमाणावर रस्ते दुरुस्ती, मजबुतीकरण आणि सुरक्षा सुधारणा कामे सुरू आहेत. त्यामुळे जड तसेच हलक्या वाहनांच्या वाहतुकीवर पूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील रस्ता अधिक सुरक्षित आणि प्रवासासाठी योग्य करण्यासाठी ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या काळात वाहनांची ये-जा धोकादायक ठरू शकते, त्यामुळेच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटक आणि स्थानिकांवर परिणाम :
वरंधा घाट हा निसर्गरम्य दृश्यांसाठी आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असल्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र महिनाभर हा मार्ग बंद राहणार असल्याने पर्यटक, स्थानिक व्यापारी तसेच वाहतूकदारांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Varandha Ghat Closed)
भोर पोलीस प्रशासनानेही वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवला असून, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग अधिक सुरक्षित, रुंद आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हे आहेत पर्यायी मार्ग :
दरम्यान, प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पुणे ते कोकण प्रवासासाठी सर्वात सोयीस्कर पर्याय म्हणजे ताम्हिणी घाट मार्ग (पुणे-मुळशी-माणगाव). या मार्गाने प्रवासाचा कालावधी थोडा वाढू शकतो, मात्र सध्या हा मार्ग सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच काही प्रवासी पोलादपूरमार्गेही प्रवास करतात. मात्र या मार्गाने प्रवास केल्यास साधारण 1 ते 2 तासांचा अतिरिक्त वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना वाहनधारकांनी योग्य पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Pune Konkan Route)
दरम्यान, एप्रिल महिनाभर वरंधा घाट पूर्णपणे बंद राहणार असल्यामुळे पुणे आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आधीच प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. विशेषतः पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






