Unseasonal Rain Maharashtra | राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम असून अनेक भागांत ढगाळ वातावरणासह जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आजही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील 24 तासात पावसाची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा :
अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (MAharashtra Rain Alert)
मराठवाड्यातील अनेक भागांत सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येत आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान :
सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेली पिके पावसामुळे खराब झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नांदेड शहरासह अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. (Unseasonal Rain Maharashtra)
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. टोकावडे, मोरोशी, शिरोशी आणि धसई परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंबा, चिकू आणि इतर फळपिकांवरील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली आहेत. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Unseasonal Rain Maharashtra | विज कोसळून दोन बैलांचा मृत्यू :
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातही वादळी पावसाने नुकसान केले आहे. अहिल्यापूर शिवारात शेतात झाडाखाली उभ्या असलेल्या दोन बैलांवर विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसामुळे शेतीसह जनावरांचेही नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढील काही दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






