vijay thalapathy | तमिळनाडूतील करूर येथे शनिवारी ‘तमिळ वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाच्या सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अभिनेते आणि टीव्हीके प्रमुख विजय (vijay thalapathy) यांनी प्रथमच भाष्य करत राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मुख्यमंत्री साहेब, सूड घ्यायचा असेल तर माझ्यावर घ्या, पण माझ्या समर्थकांना हात लावू नका,” असं भावनिक आवाहन विजय यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं.
विजय म्हणाले की, करूर सभेतील दुर्घटनेनं त्यांना मोठा धक्का बसला आहे आणि या घटनेचं राजकारण होऊ नये यासाठी त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती. मात्र, तरीही सरकारकडून त्यांच्या पक्षातील नेत्यांवर आणि सोशल मीडिया हँडलर्सवर एफआयआर दाखल होत असल्याचं त्यांनी खंतपूर्वक सांगितलं. “मी घरी आहे, ऑफिसमध्ये आहे, तुम्हाला जे करायचं ते माझ्यासोबत करा. पण निरपराध कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका,” असं ते म्हणाले. (vijay thalapathy Karur Accident)
आरोप-प्रत्यारोप सुरू :
करूरमधील या सभेत अंदाजे ३० हजार लोक येतील असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात ६० हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. विजय यांच्या लोकप्रियतेमुळे अपेक्षेपेक्षा दुप्पट गर्दी झाली आणि अचानक झालेल्या पळापळीमुळे चेंगराचेंगरी झाली. यात अनेक जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला, मात्र त्यानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणावर सरकारची बाजू मांडण्यासाठी आयएएस अधिकारी पी. अमृता, आरोग्य सचिव सेंथिल कुमार आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. डेव्हिडसन देवासिरवाथम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सभेत नियमांचं उल्लंघन झाल्याचे पुरावे दाखवत प्रशासनाने आपलं कर्तव्य बजावल्याचा दावा केला.
करूरमध्येच हे का घडलं? सत्य बाहेर येईल :
दुसरीकडे विजय यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सरकारवर थेट सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला. “पाच महिन्यांपासून मी प्रचार दौरे करत आहे. इतर जिल्ह्यांत सर्व काही व्यवस्थित पार पडलं, मग करूरमध्येच हे का घडलं? सत्य बाहेर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या घटनेमुळे तमिळनाडूच्या राजकारणात तापमान चांगलंच वाढलं आहे. द्रमुक आणि टीव्हीके यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. विरोधकांनी सरकारवर सुरक्षिततेत ढिलाईचा ठपका ठेवला आहे, तर प्रशासनानं जबाबदारी आयोजकांवर ढकलली आहे.विजय यांच्या भावनिक आवाहनानंतर या घटनेचं राजकारण थांबेल का, की वाद आणखी चिघळतील, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.






