Pune | आपण २१व्या शतकात जगत असलो तरी शिक्षण, प्रगती, तंत्रज्ञान यामध्ये झपाट्याने पुढे जात असलो तरी समाजात अजूनही काही जुने आणि क्रूर विचारधारेचे अंश टिकून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हुंडा. हुंड्याच्या नावाखाली मुलींचा होणारा मानसिक आणि शारीरिक छळ म्हणजे आजही आपल्या समाजाच्या माथ्यावरचा एक काळा डागच आहे. नुकत्याच घडलेल्या पुण्यातील दोन घटनांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
दीपाचा दुःखद अंत :
पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे हिच्या मुत्यूची घटना ताजी असतानाच, पुण्याच्या हडपसर परिसरात आणखी एका विवाहितेने हुंड्याच्या छळाला कंटाळून जीवन संपावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देवकी प्रसाद पुजारी उर्फ दीपा ही अवघ्या २२ वर्षांची तरुणी होती. तिचं नुकतंच 18 एप्रिल रोजी विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात लग्न झालं होतं.
१८ मे रोजी दीपाने पुन्हा एकदा आपल्या वडिलांना फोन केला होता. या वेळी ती प्रचंड घाबरलेली होती. ती रडत रडत सांगत होती की, “बाबा, ते लोक मला सतत शिव्या घालतात, मारहाण करतात… सामान दिलं नाही म्हणून त्रास देतात.” वडिलांनी तिला धीर दिला, “मी येतो, सर्व काही ठीक करतो,” असं सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी तिने जीवनसंपवले.
चार तोळे सोने, दहा लाख आणि तरीही ना संपणारी हाव :
लग्नात वडिलांनी चार तोळे सोने, दहा लाखांचा खर्च केला होता. पण सासरच्यांची अपेक्षा भांडी, फ्रीजसारख्या वस्तूंवर थांबली नाही. दुसऱ्याच दिवशीपासून तिला शिवीगाळ, मारहाण, तिरस्कार यांचा सामना करावा लागला. शेवटी १९ मे रोजी तिने जगाचा निरोप घेतला.
दीपाच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे पती प्रसाद पुजारी, दीर प्रसन्ना पुजारी, सासू सुरेखा पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी हे तिला वारंवार शिवीगाळ करत होते. तिची मानसिक अवस्था खालावल्याने तिने माहेरी जाऊन तक्रार केली होती. मात्र, सासऱ्याने समजूत घालून तिला परत नेलं.






