Sharad Pawar | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकीत स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीत शरद पवार यांनी पक्षाच्या नव्या राजकीय दिशेचा इशारा दिला असून, तरुणांना मोठी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक निवडणुकांसाठी शरद पवारांचा नवा प्लॅन :
छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली. यामध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खासदार आणि आमदार उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना, विशेषतः राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना ५० टक्के संधी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “ज्या तरुणांमध्ये नेतृत्वगुण आहेत आणि जे समाजासाठी काम करत आहेत, त्यांना राजकारणात येण्याची संधी द्या. जास्तीत जास्त नवीन पिढीला पुढे आणा.”
Sharad Pawar | महाविकास आघाडीच्या रणनीतीवरही चर्चा :
या बैठकीत महाविकास आघाडीतील पुढील रणनीतीबाबत देखील प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असून, स्थानिक निवडणुकांमध्ये कोणत्या पातळीवर युती करायची याचा अंतिम निर्णय त्या बैठकीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “कधी काळी आमच्यासोबत असणारे काही लोक आज अशा पद्धतीने वक्तव्य करत आहेत. पण आपण त्याला प्रतिसाद देताना जातीय सलोखा बिघडवू नये. प्रेमाची भाषा वापरा.”
शरद पवार यांनी स्पष्ट संदेश दिला की, आगामी काळात पक्षाने नकारात्मक भाषणाऐवजी सकारात्मक विचार मांडावेत आणि सर्व समाजघटकांना एकत्र ठेवावे.






