Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांची दिवाळीनंतर भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि पुरंदर विमानतळ (Purandar Airport) प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
शरद पवारांचं मोठं वक्तव्य :
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होताना पवार यांनी सरकारकडून जाहीर झालेल्या मदतीवर नाराजी व्यक्त केली. “महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती उद्ध्वस्त झाली आहे. काही ठिकाणी तर पीक येणारी जमीनच खरवडून गेली आहे, त्यामुळे शेतकरी अत्यंत अस्वस्थ आहे,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, या तोकड्या रकमेतून शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. पवार यांनी सांगितले की, “संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राजकारण न करता सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. मात्र, सरकारकडून मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी दिसत नाही.”
Sharad Pawar | पुरंदर विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर :
पुरंदर विमानतळाचा प्रश्नही ऐरणीवर असून, याबाबतही शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली आहे. विमानतळासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, “शेतकऱ्यांची मागणी केवळ मोबदल्याची नसून, विमानतळाची जागा बदलण्याची आहे. हा निर्णय केंद्र सरकारचा असला तरी, शेतकऱ्याला आणि जमीन मालकाला उद्ध्वस्त करून कोणताही प्रकल्प होऊ शकत नाही.”
शेतकऱ्यांची जमीन बेकायदेशीरपणे कोणी घेऊ शकत नाही, असे ठामपणे सांगत पवार यांनी विमानतळासाठी योग्य नुकसानभरपाई आणि पर्यायी जमीन देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. “या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे. दिवाळी संपल्यावर मी स्वतः मुख्यमंत्र्यांची वेळ घेईन आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह त्यांची भेट घेईन,” असे आश्वासन पवार यांनी दिले आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर होणाऱ्या या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






