Nishikant Dubey | भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी पाकिस्तानच्या भविष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, २०२५ मध्ये पाकिस्तानचे अस्तित्व नष्ट होईल आणि त्याचे चार वेगळे भाग केले जातील. त्यांच्या या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
निशिकांत दुबे काय म्हणाले?
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील महेशमारा रेल्वे हॉल्टच्या पायाभरणी कार्यक्रमात बोलताना निशिकांत दुबे यांनी म्हटलं की, २०२५ मध्ये पाकिस्तानचे चार भाग होतील. पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी म्हटलं की, मोदी सरकार (Modi Govt) कोणत्याही किंमतीत या हल्ल्याचा बदला घेणार आहे. दुबे यांनी सांगितले की, जर दावा खोटा ठरला तर भाजपवर खोट्या आश्वासनांचा आरोप होऊ शकतो, परंतु त्यांचा विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नेतृत्व हे ठाम आहे.
त्यांनी यावेळी ठामपणे म्हटलं की, पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग भारत परत घेणारच. तसेच पाकिस्तानमधील बलुचिस्तान, पश्तुनिस्तान आणि पंजाब हे स्वतंत्र देश म्हणून तयार होतील. दुबे म्हणाले, “जर २०२५ नंतर पाकिस्तानचे विभाजन झाले नाही, तर तुम्ही भाजप खोटे आहे असे म्हणायला मोकळे आहात.”
मोदी सरकार हल्ल्याचा बदला घेणारच
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निशिकांत दुबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “पाकिस्तानी सैन्याने भारतीयांवर, विशेषतः हिंदूंवर, निशाणा साधला आहे.” त्यांनी स्पष्ट केले की मोदी सरकार कोणत्याही किंमतीत या हल्ल्याचा बदला घेईल. देशाच्या नेतृत्वाबाबत बोलताना दुबे म्हणाले की, आज देशाचा कारभार अशा पंतप्रधानांच्या हातात आहे, ज्यांना जगभर त्यांच्या सामर्थ्यामुळे ओळखले जाते.
दुबे यांनी हेही सांगितले की, बिहारच्या भूमीतून पंतप्रधानांनी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांचा नायनाट करण्याची स्पष्ट घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीरचे संपूर्ण कुटुंब परदेशात पळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. निशिकांत दुबे यांनी विश्वासाने म्हटले की, मोदी सरकार या हल्ल्याचा बदला नक्कीच घेणार आहे.






