मान्सूनसंदर्भात महत्वाची बातमी! ‘या’ तारखेला होणार एन्ट्री

On: May 26, 2026 1:09 PM
Monsoon Update
---Advertisement---

Monsoon Update | देशभरातील शेतकरी आणि नागरिक ज्या मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत, त्या मोसमी वाऱ्यांच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये (Keral) दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा अंदाज चुकीचा ठरला असून आता मान्सून नेहमीच्या वेळेनुसार जूनच्या सुरुवातीलाच केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.

केरळात मान्सूनसाठी अजून प्रतीक्षा :

भारतीय हवामान विभाग (IMD) च्या ताज्या माहितीनुसार, मान्सून सध्या अरबी समुद्र परिसरातच सक्रिय आहे आणि त्याची आगेकूच अपेक्षेपेक्षा मंद गतीने सुरू आहे. केरळातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असला तरी हवामान तज्ज्ञांनी त्याला अधिकृत मान्सून घोषित केलेले नाही. हा पाऊस मान्सूनपूर्व स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान तज्ज्ञांच्यामते, यंदा मान्सून वेळेपूर्वी भारतात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु सध्याच्या वातावरणीय स्थितीनुसार मोसमी वारे नियमित वेळेनुसारच पुढे सरकत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन क्षेत्र, तसेच बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि अंदमान समुद्र परिसरात मान्सून पुढे जाण्यास पोषक परिस्थिती निर्माण होणार असल्याचे विभागाने म्हटले आहे.

Monsoon Update | उष्णतेचा तडाखा आणि पावसाचा इशारा :

सध्याच्या परिस्थितीनुसार 1 जून रोजीच मान्सून केरळ किनारपट्टीवर अधिकृतपणे दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केरळ आणि माहे भागात 11 ते 20 सेंटीमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. तसेच तामिळनाडू (Tamil Nadu), पुडुचेरी (Puducherry), कराईकल (Karaikal), उप-हिमालयीन पश्चिम बंगाल (West Bengal), सिक्कीम (Sikkim), आसाम (Assam) आणि मेघालय (Meghalaya) येथेही चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दुसरीकडे उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. राजधानी (Delhi) मध्ये मे महिन्यातील गेल्या 14 वर्षांतील सर्वाधिक उष्ण रात्र नोंदवली गेली असून किमान तापमान 32.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. देशातील 31 शहरांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे गेले होते. बांदा, ब्रह्मपुरी आणि खजुराहो या भागांमध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली.

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी (Weather Red Alert) करण्यात आला आहे. अकोला आणि नागपूर येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया येथे यलो अलर्ट लागू आहे. त्याचवेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे(Pune) सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर (Ahilyanagar), नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

News title : Monsoon Arrival Delayed Again

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now