Monsoon Update | अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल कमालीची संथ असल्याने एका बाजूला बळीराजा चिंतेत आहे, तर दुसऱ्या बाजूला शहरी भागांवरही पाणी टंचाईचे (Water Scarcity) मोठे संकट घोंगावू लागले आहे. राज्यात मान्सूनची प्रगती अद्याप संथ गतीने सुरू असून अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र बहुतांश भागांत उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२४ जूननंतर कोकणात जोर वाढणार
मिळालेल्या माहितीनुसार, 24 जूननंतर कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे कोकणातील काही जिल्ह्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी राज्यातील इतर भागांना आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागू शकते.
दरम्यान, कमी पावसाचा परिणाम आता पाणीसाठ्यावरही दिसून येत आहे. ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासन पाणी कपात वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे शहरावर भीषण पाणी संकट; धरणांतील साठा तळात
सध्या ठाण्यात 15 दिवसांच्या कालावधीत 12 दिवस पाणीपुरवठा शटडाऊन केला जात आहे. मात्र पाणीसाठ्यातील घट कायम राहिल्यास आठवड्यातून 24 तासांचा अतिरिक्त पाणी शटडाऊन लागू करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या भातसा धरणात केवळ 11 टक्के तर बारवी धरणात 24 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
News Title: Monsoon Update Thane Water Crisis Weather Forecast Maharashtra






