MLA Sanjay Gaikwad | मुंबईतील (Mumbai) आकाशवाणी आमदार निवासातील (Akashvani MLA Hostel) कँटीनच्या ठेकेदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी गुरुवारी दक्षिण भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही गायकवाडांच्या कृत्याची निंदा केली आहे.
माझा मार्ग चुकला असेल-
बुधवारी आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ते आमदार निवासातील कँटीन ठेकेदाराला शिळे अन्न दिल्याबद्दल कानशिलात लगावताना आणि ठोसे मारताना दिसत होते. मारहाणीपूर्वी ते डाळीचे पॅकेट ठेकेदाराला वास घेण्यासाठी भाग पाडत होते. या मारहाणीबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त न करता, गायकवाड यांनी गुरुवारी आपल्या कृत्याचे समर्थन केले. “मी वेटरला नाही, मॅनेजरला मारले. माझा मार्ग चुकला असेल, पण हेतू योग्य होता. जर कोणी पुन्हा असे केले, तर मी पुन्हा मारीन,” असे ते म्हणाले.
दक्षिण भारतीयांवर निशाणा-
याचवेळी, त्यांनी दक्षिण भारतीयांवर निशाणा साधत एक वादग्रस्त (MLA Sanjay Gaikwad) विधान केले. “कंत्राट शेट्टीला का दिले? ते मराठी माणसाला द्या. आम्ही काय खातो हे त्यांना कळते आणि ते चांगल्या दर्जाचे जेवण देतील. दक्षिण भारतीय लोक डान्स बार, लेडीज बार चालवतात आणि महाराष्ट्राची संस्कृती खराब करत आहेत. त्यांनी आमची मुले बिघडवली आहेत. ते चांगले जेवण कसे देऊ शकतात?” असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गायकवाड यांच्या वर्तनावर टीका केली. “असे वर्तन कोणासाठीही योग्य नाही. यामुळे विधिमंडळाची प्रतिमा मलिन होते आणि आमदार सत्तेचा गैरवापर करतात, असा चुकीचा संदेश लोकांपर्यंत जातो,” असे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही गायकवाड यांच्या कृत्यापासून स्वतःला दूर केले. “मी संजय गायकवाड यांना सांगितले की त्यांचे वर्तन अयोग्य होते. मी त्यांच्या कृत्याचे समर्थन करत नाही. काही चुकीचे होत असेल तर कायदेशीर कारवाई करता येते, पण लोकांना मारहाण करणे योग्य नाही,” असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून, काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (UBT) (Shiv Sena (UBT)) यांसारख्या विरोधी पक्षांनी हा सत्तेचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे.






