Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर पुन्हा निशाणा साधला. 29 ऑगस्टपासून होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला आंतरवालीत येण्याचे आवाहन केले असून, घराबाहेर गाडी न ठेवण्याचेही आवाहन केले आहे.
58 लाख नोंदींचा दाखला देत सरकारवर आरोप :
सोलापूर दौऱ्यात जरांगे पाटील यांनी आपण कोणत्याही ठिकाणी इशारा सभा घेत नसल्याचे स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यात अशी सभा घेतली असती, तर सर्व रस्ते गर्दीने भरलेले दिसले असते, असे ते म्हणाले. सध्या आपण गावखेड्यांमधील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत असून, समाजासमोर वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे केवळ गरीब मराठ्यांचे नुकसान होत नसून भाजप (BJP), शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांमध्ये असलेल्या मराठा बांधवांनाही त्याचा फटका बसत असल्याचा दावा त्यांनी केला.
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, समाजाच्या हितासाठी आपण मोठा संघर्ष केला असून 58 लाख नोंदी दिल्या आहेत. सरकारला आपण मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची जाणीव आहे, मात्र तरीही आरक्षण देण्याची त्यांची इच्छा नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून कट रचून समाजामध्ये गैरसमज निर्माण केले जात असल्याचेही ते म्हणाले. नियोजनबद्ध पद्धतीने चार प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा आरोप करत, या प्रकाराची माहिती आपण समाजासमोर मांडली असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
Manoj Jarange Patil | 29 ऑगस्टपासून आंदोलनाची तयारी :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. “मराठ्यांनो घर सोडायला शिका,” असे म्हणत 29 ऑगस्ट रोजी घरासमोर एकही गाडी ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्यभरातील मराठ्यांनी आंतरवालीत यावे, असेही त्यांनी सांगितले.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षांमध्ये असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींनी आपल्या भूमिकेत चूक असल्यास ती दाखवून द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले. संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी फोन करून कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला. घोडके नावाच्या व्यक्तीची व्हॅलिडिटी झाली, मात्र त्याच्या बहिणीची व्हॅलिडिटी रद्द झाली, याबाबत प्रश्न उपस्थित करत आपण चुकीचे काय बोललो, असा सवाल त्यांनी केला.






