Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यादरम्यान राज्य सरकारला महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर गॅझेटमधील नोंदींच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यासाठी त्यांनी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
शाहू महाराजांसोबत आरक्षणावर चर्चा : :
कोल्हापूर दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांनी सर्वप्रथम अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नवीन राजवाड्यात शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण, कोल्हापूर गॅझेट आणि कुणबी नोंदी यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राजर्षी शाहू महाराजांनी देशात आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि त्यांच्याच काळातील गॅझेटमधील नोंदी मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असे जरांगे यांनी सांगितले. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि शिंदे समितीने कोल्हापूर गॅझेटमधील कागदपत्रांचा अधिक गांभीर्याने अभ्यास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
Manoj Jarange Patil | कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा मुद्दा ऐरणीवर :
जरांगे पाटील यांनी दावा केला की, शिंदे समितीने कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ४० हजार नोंदी शोधून काढल्या आहेत. मात्र, या नोंदींच्या आधारे केवळ ३० ते ३५ हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे का देण्यात आलेली नाहीत, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील उपलब्ध नोंदींवर आधारित चार लाखांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित होऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक मराठा समाजातील नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, असे सांगत त्यांनी सरकारने आठ दिवसांच्या आत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करावे, असे स्पष्ट केले.
याशिवाय, मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत शासनाने अनेक निर्णय घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी आण्णासाहेब पाटील महामंडळ (Annasaheb Patil Mahamandal) बंद पडू देणार नसल्याचे सांगितले. कुणबी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालये स्थापन करण्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केली. कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य करताना पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी संघटितपणे पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.






