Rohini Paradhye | सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा (Mangalwedha) येथे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रिल स्टार रोहिणी पाराध्येचा (Rohini Paradhye) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या २५ वर्षीय विवाहित रोहिणी लाखो फॉलोअर्समुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध होती. पतीसोबत चालवत असलेल्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्येच तिने गळफास घेत आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हॉटेलच्या स्वयंपाकघरात टोकाचं पाऊल :
रोहिणी पाराध्ये (Rohini Paradhye) आणि तिचा पती निलेश पाराध्ये सोशल मीडियावर विनोदी आणि मनोरंजनात्मक रिल्स तयार करत असत. विशेष म्हणजे, त्यांच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरातून बनवलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र, याच स्वयंपाकघरात रोहिणीने पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. नेहमी हसतमुख दिसणाऱ्या रोहिणीच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये मोठा धक्का बसला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तणाव आणि काही वादातून रोहिणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मंगळवेढा (Mangalwedha) परिसरात हे जोडपे लोकप्रिय होते. ‘हॉटेल ग्रामपंचायत’ हे त्यांच्या व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनले होते आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे हॉटेललाही मोठी ओळख मिळाली होती.
Rohini Paradhye | सासऱ्यांनी सांगितला त्या दिवसाचा घटनाक्रम :
रोहिणीच्या सासऱ्यांनी माध्यमांशी बोलताना त्या दिवशी घडलेल्या घटनांची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते दुपारच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या कामासाठी बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर मोबाईल तिथेच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर ते पुन्हा मोबाईल आणण्यासाठी गेले. त्याचवेळी त्यांना फोनवरून रोहिणीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यास सांगितले आणि स्वतःही तेथून निघाले.
रोहिणीला प्रथम महिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. ते रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टर तिची तपासणी करत होते. काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांना बोलावून आवश्यक कागदपत्रांवर सही घेतली आणि रोहिणी आता या जगात नसल्याचे सांगितले. या घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सासऱ्यांनी सांगितले की, त्या दिवशी सकाळपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते आणि हॉटेल व्यवसायही चांगला सुरू होता. त्यामुळे अचानक असे काय घडले, याबाबत कुटुंबीय अजूनही संभ्रमात आहेत.






