Uddhav Thackeray | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पक्षातील एका बड्या नेत्याने राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हा मोठा राजकीय धक्का बसल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
विशेषतः सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (solapur mahapalika election) पार्श्वभूमीवर हा राजीनामा आल्यामुळे त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या अंतर्गत वादांचा थेट परिणाम आता पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर होत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
सोलापुरात नेमकं काय घडलं? :
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील (santosh patil) यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षातील अंतर्गत घडामोडींमुळे नाराज होते. पक्षातील मतभेद आणि संघटनात्मक विस्कळीतपणामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केल्याचं सांगितलं जात आहे.
सोलापुरात याआधीच असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वशैलीवर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती. या नाराजीचा स्फोट आता थेट राजीनाम्याच्या रूपाने समोर आल्यामुळे ठाकरे गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे.
Uddhav Thackeray | 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे :
राजीनाम्यांची ही मालिका इथेच थांबलेली नाही. सोलापुरात याच मुद्द्यावरून 100 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अजय दासरी यांच्यावर सोपवली असली, तरी त्यांच्या कारभारावर पक्षांतर्गत तीव्र नाराजी असल्याचं उघड झालं आहे. (solapur Municipal Election)
एकीकडे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा आणि दुसरीकडे मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी घेतलेली माघार, यामुळे ठाकरे गटाची सोलापुरातील ताकद कमकुवत झाल्याचं मानलं जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील ही बंडाळी किती महागात पडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या घडामोडींची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार का आणि सोलापुरातील नुकसान कसं भरून काढणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.






