Maharashtra Weather Update | राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावर होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर चढउतार पाहायला मिळणार आहेत. जानेवारीचा दुसरा आठवडा सुरू असतानाही काही भागांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Unseasonal Rain Alert)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कधी थंडी तर कधी उष्णतेचा अनुभव नागरिक घेत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी असताना महाराष्ट्रात मात्र तापमानात वाढ जाणवत आहे. दुसरीकडे थंडी काही प्रमाणात कमी झाली असली तरी वायू प्रदूषणाची समस्या कायम असून त्यामुळे श्वसनासंबंधी आजारांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. डॉक्टरांकडून नागरिकांना मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे.
पुण्यासह अनेक भागांत तापमानाचा विचित्र खेळ :
राज्यातील काही भागांत तापमानातील तफावत विशेषत्वाने जाणवत आहे. पुणे शहरात अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरात किमान तापमानात तब्बल सहा अंश सेल्सिअसपर्यंत फरक नोंदवण्यात आला आहे. काही भागांत किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून काही परिसरांत ते 15 अंशांच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे. वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकासकामे, सिमेंटचा वाढता वापर आणि काही ठिकाणी अजूनही टिकून असलेली हिरवाई यामुळे शहरातील हवामानावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद धुळे येथे झाली असून तेथे 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. निफाड (Nifad) येथे किमान तापमान 7.7 अंश सेल्सिअस होते. भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia) आणि मालेगाव येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, देशातील सर्वात नीचांकी तापमान पंजाबमधील भटिंडा येथे 0.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. (Heavy Rain Alert)
Maharashtra Weather Update | अवकाळी पावसाचा इशारा, काही भागांत ढगाळ वातावरण :
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या असून त्यानंतर तापमानात सतत चढउतार दिसून येत आहेत. उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याची शक्यता असून, उर्वरित भागांत ढगाळ हवामानाचा प्रभाव जाणवणार आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.






