Maharashtra Rain Alert | आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांसह वारकऱ्यांनीही सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील विविध भागांत पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याचे (IMD) भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) यांनी स्पष्ट केले आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर :
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने पुन्हा वेग घेतला असून, पुढील 48 ते 72 तासांत अनेक भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागांत ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
आज रायगड (Raigad) जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे (Thane), मुंबई (Mumbai), पालघर (Palghar), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), नाशिक (Nashik) घाटमाथा आणि कोल्हापूर (Kolhapur) घाटमाथा या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Alert | उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा अंदाज :
उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon) आणि नाशिक जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नसला तरी या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारीपासून या विभागात पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे (Pune) आणि सातारा (Satara) घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूर घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली (Sangli), सोलापूर (Solapur) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही भागांत हलका ते मध्यम, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.






