Mumbai BEST Buses | दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. प्रवासात विलंब होऊ नये आणि परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) प्रशासनाने विशेष व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा काळात शहर आणि उपनगरांमध्ये अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
परीक्षा काळासाठी विशेष वाहतूक नियोजन
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांचा विचार करून (BEST) प्रशासनाने वाहतुकीचे सविस्तर नियोजन आखले आहे. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून 11 मार्चपर्यंत, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. या दरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देणार असल्यामुळे बसमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. (Mumbai BEST Buses)
विद्यार्थ्यांचा प्रवास सोयीस्कर आणि सुरक्षित व्हावा यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर आणि उपनगरांमध्ये जादा बसेस चालवण्यात येतील. परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर वाहतूक मिळावी, यासाठी ही योजना राबवण्यात येत असून, गर्दीमुळे उशीर होण्याची शक्यता कमी होईल, असा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Mumbai BEST Buses | मागणीनुसार तातडीने अतिरिक्त बस सेवा
बेस्ट प्रशासनाने विभागीय आणि आगार व्यवस्थापकांना विशेष सूचना दिल्या असून, एखाद्या मार्गावर विद्यार्थी किंवा पालकांकडून जादा बसची मागणी झाल्यास तात्काळ त्या मार्गावर अतिरिक्त बस सोडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यास किंवा अचानक गर्दी निर्माण झाल्यास परिस्थितीनुसार बस फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. (Mumbai BEST Buses)
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा काळात बसमध्ये पुढील दरवाजातून चढण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे, ज्यामुळे गर्दी टाळता येईल आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित होईल. तसेच बसचालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागावे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रमुख बस स्थानकांवर निरीक्षक आणि अधिकारी नियुक्त करून गर्दी नियंत्रणाची अतिरिक्त यंत्रणा उभारण्यात येणार आहे.






