Dhananjay Munde | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून समर्थक, कार्यकर्ते आणि नेते भावूक प्रतिक्रिया देत आहेत. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रवासादरम्यानचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अजित पवार (Ajit Pawar) हे केवळ राजकीय मार्गदर्शकच नव्हते, तर माझ्या आयुष्यातील आधारस्तंभ होते, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अजित पवारांनी मला कधीही वडील नाहीत याची जाणीव होऊ दिली नाही, त्यांनी पितृछत्राची उणीव भरून काढली होती, असे म्हणत मुंडे भावूक झाले आहेत.
प्रवासात फुटला भावनांचा बांध :
अजित पवार (AJit Pawar Death) यांच्या अपघाताची बातमी समजताच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तातडीने बीडहून बारामतीकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान एका निकटवर्तीय सहकाऱ्याचा फोन आल्यावर त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. गदगदलेल्या आवाजात त्यांनी “माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधीही पोरकं वाटू दिलं नाही,” असे म्हणत भावना व्यक्त केल्या. बोलताना भावनांचा बांध फुटल्याने त्यांनी “सॉरी, मी नंतर बोलतो,” असे म्हणत फोन ठेवला, आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
View this post on Instagram
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या भावना समजून घेत संवेदना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं नातं हे केवळ राजकीय नव्हे, तर मार्गदर्शक आणि शिष्य याच्या पलीकडचं होतं, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
Dhananjay Munde | अजित पवार हे धनंजय मुंडेंचे सर्वात मोठे आधार होते :
राजकीय वर्तुळात अजित पवार हे धनंजय मुंडेंचे सर्वात मोठे आधार मानले जात होते. अनेकदा व्यासपीठांवरून अजित पवार यांनी मुंडेंचं नाव घेत त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या राजकीय संघर्षात अजित पवार नेहमीच ढाल बनून उभे राहत आणि प्रत्येक निर्णयात मुंडेंनी दादांवर विश्वास ठेवला होता.
केवळ स्वकीयच नव्हे तर विरोधकही अजित पवार यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत आहेत. विविध नेत्यांनी त्यांना कष्टकऱ्यांचे कैवारी आणि धडाडीचे प्रशासक म्हणून गौरवले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून बारामतीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून समर्थक आणि नेते धाव घेत आहेत.






