Devendra Fadnavis | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी समृद्धी महामार्गावरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे श्रेय आपण आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनाच जात असल्याचा ठाम दावा केला.
समृद्धी महामार्गाशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगत फडणवीस म्हणाले की, हा प्रकल्प प्रत्यक्षात कसा उभा राहिला, याची वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे. केवळ नाव देऊन किंवा उद्घाटन करून श्रेय मिळत नाही, तर प्रकल्पासाठी घेतलेले निर्णय, अंमलबजावणी आणि मेहनत महत्त्वाची असते, असा टोला त्यांनी लगावला.
समृद्धी महामार्गाची सुरुवात कशी झाली? :
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांना एमएसआरडीसी खाते देण्यात आले होते, मात्र त्या खात्यात काहीच नसल्याने ते नाराज होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना हे खाते दिले, पण त्या खात्यातून काही मोठं होईल, अशी त्यांची अपेक्षा नव्हती. मात्र आपण स्वतः शिंदे यांना विश्वास दिला की, हे खाते मोठं करू आणि समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात आणू.
भूमी अधिग्रहण करताना थेट खरेदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी खास टीम तयार करून गावागावात जाऊन महामार्गाचा फायदा, भरपाई आणि विकास याबाबत माहिती दिली. त्यामुळे लोक तयार झाले आणि एकाच दिवसात मोठ्या प्रमाणावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत प्रकल्पाला गती दिली.
Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंवर थेट आरोप :
उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या विरोधात सभा घेतल्या होत्या, असा आरोप करत फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ज्या प्रकल्पाला विरोध केला, त्याचे श्रेय कसे घेता येईल? महामार्गाचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर केवळ त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले, एवढाच सहभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे कोणत्या संवैधानिक पदावर होते, कोणत्या निर्णयात त्यांचा थेट सहभाग होता, असा सवाल उपस्थित करत फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) उद्धव ठाकरे यांच्याशी कोणताही संबंध नाही. हा महामार्ग माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून उभा राहिला आहे आणि त्याचे श्रेय आम्ही दोघेही कधीच एकट्याने घेतलेले नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.






