Amol Mitkari | राज्यात मंत्र्यांच्या ओएसडी (OSD) आणि स्वीय सहाय्यकांच्या (PA/PS) नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, मंत्रिमंडळातील दलाली पूर्णपणे बंद केली जाईल आणि त्यासाठी विशेष यंत्रणा तयार केली जात आहे. मात्र, मंत्र्यांच्या ओएसडींची नावे निश्चित करण्यावरून सध्या मंत्रालय आणि राजकीय वर्तुळात मोठे घडामोडी घडत आहेत. (Amol Mitkari)
राष्ट्रवादी नेत्यांच्या आरोपांमुळे तणाव वाढला
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी ओएसडीच्या नेमणुकीवर भाष्य करताना सांगितले होते की, “मुख्यमंत्री कोणाचंच चालू देत नाहीत.” मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कडवट प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. मंत्र्यांनी फक्त नावांचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी चालेल, पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशा ‘फिक्सर’ लोकांना मंजुरी दिली जाणार नाही!”
मंत्र्यांच्या ओएसडी नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी दावा केला की, “माझ्याकडून एका मंत्र्यांच्या ओएसडीने 5 कोटी रुपयांच्या कामासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती.”
त्यांनी पुढे सांगितले की, “ही घटना तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदीपन भूमरे (Sandipan Bhumre) यांच्या ओएसडी संदर्भात घडली होती.” यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचं स्वागत करत पारदर्शक कारभाराच्या समर्थनार्थ आपले मत मांडले.
मुख्यमंत्री कार्यालयाची स्वीय सहाय्यकांवर बारीक नजर
सध्या मंत्र्यांकडे असलेले PA, PS आणि OSD हे पुढील पाच वर्षे कायम राहतीलच, असे नाही. त्यांच्याविरोधात तक्रारी आल्यास आणि त्यामध्ये तथ्य आढळल्यास त्यांना तातडीने काढून टाकले जाणार आहे. याशिवाय, काही मंत्र्यांनी “उसनवारी” (Loan) तत्त्वावर आपल्या कार्यालयात लोकांची भरती केली आहे, त्यांच्यावरही नियंत्रण आणले जाणार आहे. ओएसडी आणि स्वीय सहाय्यक योग्य रीतीने काम करतात की नाही, त्यांनी घेतलेले निर्णय पारदर्शक आहेत का, यावर मुख्यमंत्री कार्यालयाची (CMO) सतत नजर असेल आणि वेळोवेळी त्यांची कामगिरी तपासली जाणार आहे. (Amol Mitkari)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, “जे गडबड करतील, त्यांना तातडीने काढले जाईल.” त्यामुळे, आता मंत्रिमंडळातील दलालीसाठी आणि भ्रष्टाचारासाठी कोणतेही स्थान नसेल, अशी भूमिका स्पष्ट झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कठोर भूमिकेचं राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार समर्थन होत आहे.
Title : CM Fadnavis Cracks Down on OSD Appointments Amol Mitkari Makes Big Allegation






