Health Update | पावसाळा सुरू होताच बदलत्या हवामानाचा परिणाम थेट लहान मुलांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. पुण्यासह अनेक भागांमध्ये 2 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अतिसार यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. डॉक्टरांनी पालकांना योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शाळांमध्ये एकत्र येणं, वातावरणातील आर्द्रता, दूषित अन्न व पाणी यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमी होऊन संक्रमण होण्याचा धोका वाढतो. तसेच “या आजारांमुळे उपचार वेळेवर न झाल्यास गंभीर गुंतागुंतींचा धोका संभवतो.”
10 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्गजन्य आजार वाढले :
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दैनंदिन ओपीडीमध्ये सर्दी-खोकल्याचे 15, अतिसाराचे 4 आणि तापाचे सुमारे 5 रुग्ण दररोज समोर येत आहेत. बदललेलं हवामान, साचलेलं सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, त्वचेचे फोड, बुरशीजन्य संसर्ग, ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया यासारखे आजार पसरत आहेत.
या आजारांमुळे डिहायड्रेशन किंवा श्वसनसंस्थेवर परिणाम होण्याचा धोका निर्माण होतो. विशेषतः लहान मुलांमध्ये या संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी वेळेवर काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
Health Update | डॉक्टरांचा प्रतिबंधात्मक उपायांचा सल्ला :
तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार, पालकांनी खालील खबरदारी घ्यावी:
– फक्त उकळून थंड केलेलं पाणीच वापरावं
– उघड्यावरचं अन्न टाळावं
– नियमित हात धुणं, सॅनिटायझर वापरणं
– डास प्रतिबंधक वापरणं
– घराभोवती साचलेलं पाणी काढून टाकणं
– हवामानानुसार संपूर्ण शरीर झाकणारे कपडे वापरणं
– या साध्या उपाययोजनांनी मुलांना संसर्गापासून वाचवता येऊ शकतं.
पुण्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. डॉक्टरांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून योग्य वेळी उपचार घेण्याचा सल्लाही दिला आहे.






