Eknath Shinde | राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौर पदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीतच आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाला भाजपाकडून मोठा धक्का बसल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळे आगामी निवडणुकांचे समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून मुंबई, कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombiwli) आणि उल्हासनगरमध्ये युतीची सत्ता आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू असतानाच भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र लढणार की स्वतंत्र, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अशातच शिंदे गटाला बसलेल्या या धक्क्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
तानाजी सावंतांच्या कुटुंबीयांचा भाजप प्रवेश :
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी थेट भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत पुतण्यानेही भाजपमध्ये प्रवेश करत मोठी राजकीय हालचाल घडवून आणली आहे. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाच्या राजकारणाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. (Maharashtra politics News)
तानाजी सावंत यांच्या पुतण्याला सोलापूरच्या मानेगावमधून उमेदवारी देण्यात आली असून, अनेक समर्थकांसह हा प्रवेश झाला आहे. शिवाजी सावंत यांनी सांगितलं की, त्यांच्या राजकीय प्रवासावर पक्षाने विश्वास दाखवला असून अनेक अडचणी असूनही भाजपने संधी दिल्यामुळे समाधान व्यक्त केलं आहे.
Eknath Shinde | जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी फोडाफोडीचे राजकारण :
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात पक्षांतर आणि गटबाजीचे राजकारण वाढताना दिसत आहे. या घडामोडींचा शिंदे गटावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया काय येते, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






