Kerala High Court | केरळ (Kochi) उच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे की, पतीने पत्नीच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेणे हा गंभीर स्वरूपाचा मानसिक अत्याचार (Mental Cruelty) आहे. असे वर्तन वैवाहिक जीवनाच्या मूळ पायावरच घाला घालणारे असून, ते घटस्फोटासाठी (Divorce) एक भक्कम कारण ठरते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
विश्वास, प्रेम आणि सन्मानाचा अभाव
एका महिलेने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) सुनावणी झाली. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन (Devan Ramachandran) आणि न्यायमूर्ती एम. बी. स्नेहलता (M.B. Snehalata) यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले की, वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास, प्रेम, सन्मान आणि सामंजस्य हेच घटक सर्वात महत्त्वाचे असतात.
पती-पत्नीच्या नात्यात जिथे संशयाला जागा असते, तिथे विश्वास असूच शकत नाही, असे मत न्यायालयाने मांडले. पत्नीवर सातत्याने संशय घेणे हे तिचे सन्मान आणि मानसिक आरोग्य या दोन्हीसाठी अत्यंत घातक ठरते. अशा परिस्थितीत एकत्र राहणे अशक्य होते, त्यामुळे महिलेचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
Kerala High Court | विश्वास संपला की विवाह बनतो ओझे
न्यायालयाने पुढे म्हटले की, विवाह हा विश्वास, सन्मान आणि भावनिक-शारीरिक सुरक्षिततेच्या आधारावरच टिकून राहतो. जर या मूलभूत गोष्टीच नात्यातून नाहीशा झाल्या, तर असे विवाहबंधन केवळ एक ओझे (Burden) बनून राहते, ज्याचा कोणालाच फायदा होत नाही.
या प्रकरणातील जोडप्याचा विवाह २०१३ साली झाला होता. पत्नी (Plaintiff) एक परिचारिका (Nurse) म्हणून काम करत होती, तर पती परदेशात नोकरीला होता. तिने पतीसोबत राहण्यासाठी आपली नोकरी सोडली आणि ती त्याच्यासोबत परदेशात गेली. मात्र, तिथेही पतीने संशय घेणे न सोडल्याने अखेर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला.






