Aditya Thackeray | राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आले असतानाच, भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे )Nitesh Rane) यांनी मोठा गौप्यस्फोट करत आदित्य ठाकरे यांच्यावर अटक होण्याचे संकेत दिले आहेत. “उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो,” असं वक्तव्य करत नितेश राणे यांनी एकच राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी हे वक्तव्य केलं. डिनो मोरिया प्रकरणात होत असलेल्या कारवायांमुळे ठाकरे कुटुंब अडचणीत येऊ शकते, असा सूचक इशारा त्यांनी दिला. या वक्तव्यानंतर ठाकरे वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
डिनो मोरिया प्रकरण आणि जेलची शक्यता? :
डिनो मोरियावर (Dino Moria) ईडीने सुरू केलेल्या तपासाची फाईल सध्या गरम असतानाच, त्याचे काही संबंध मुंबईतील नालेसफाई प्रकरणाशी जोडले जात आहेत. डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणाचे निकटवर्तीय होता, याकडे लक्ष वेधत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंचं (Aditya Thackeray) नाव घेतलं.
राणे यांच्या म्हणण्यानुसार, याच प्रकरणामुळेच ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगवली जात आहे, जेणेकरून लक्ष भटकवता येईल. “आता पावसाळ्यात तुरुंगवारी होणार, हे सुद्धा ठरलेलं आहे”, असं म्हणत त्यांनी आरोपांची धार अधिक तीव्र केली.
ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका, हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर :
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवरही नितेश राणे (Nitesh Rane)यांनी जोरदार टोले लगावले. “एका बाजूला २० आमदार, दुसऱ्या बाजूला शून्य, आणि आम्ही घाबरलो म्हणे!” असं म्हणत त्यांनी या युतीची खिल्ली उडवली. या वक्तव्याने ठाकरे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
त्याचबरोबर, “हिंदुत्व सोडल्यामुळे ठाकरे ब्रँड बुडाला,” असा घणाघात करत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. तुळजाभवानी दर्शनानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हे सर्व वक्तव्य केले.






