Maharashtra Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार दिसत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ लागला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या लाटेमुळे महाराष्ट्रातील तापमान झपाट्याने घसरत आहे. भारतीय हवामान विभागाने 10, 11, 12 आणि 13 डिसेंबरला थंडीचा यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस राज्यात गारठा आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Cold Wave Alert)
दरवर्षीपेक्षा यंदा देशभरात पावसाचे प्रमाण जास्त राहिले. काही राज्यांत अजूनही अधूनमधून पाऊस सुरूच आहे. मात्र आता वातावरण बदलत असून थंडीची तीव्रता अचानक वाढली आहे. पुणे, मुंबई, नगर, जळगाव, परभणी, धुळे अशा अनेक शहरांमध्ये तापमानात मोठी घसरण झाली असून रात्रभर गारठा कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. (Maharashtra Weather Update)
महाराष्ट्रातील तापमानात विक्रमी घसरण :
अचानक वाढलेल्या थंडीमुळे पुण्यातील किमान तापमान 8.9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये तापमानात झालेली घट ही उल्लेखनीय असून पुणेकर (Pune Temperature) अक्षरशः गारठले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात तापमानात आणखी घसरण होणार असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. मुंबईतही वातावरणात गारठा वाढला असून सकाळी व रात्रीची थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
तसेच राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली असून तेथे 5.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. परभणीत 5.9 अंश, तर नागपूर, भंडारा, गोदिंया, आहिल्यानगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये 9 अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. त्यामुळे राज्यात थंडीची लाट अधिक तीव्र होत आहे.
Maharashtra Weather Update | दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता :
थंडीबरोबरच हवामान विभागाने 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर रोजी काही राज्यांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पुडुचेरी, कराईकल, माहे आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे त्या राज्यांमध्येही हवामान बदलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. (India Weather Update)
देशभरातील हवामानात बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अचानक वाढणारा गारठा, धुकं, कोरडे हवामान यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाचे त्रास, अस्थमा आणि साइनसची समस्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य कपडे व उबदार साहित्य वापरण्याचा सल्ला दिला आहे.






