Chakan MIDC | पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे चाकण MIDC परिसरातील सुमारे 20 कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या कंपन्यांमध्ये जवळपास 2 हजार कामगार कार्यरत असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली.
कंपन्या बंद होण्याच्या आकडेवारीवर फडणवीसांचं स्पष्टीकरण :
शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कंपन्या बंद होण्याच्या आकडेवारीबाबत स्पष्टीकरण दिले. संसदेत खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याची माहिती दिली होती. या आकडेवारीचा काही नेत्यांनी आपल्या सोयीने अर्थ लावत सोशल मीडियावर प्रचार केला आणि त्यावर माध्यमांमध्येही बातम्या प्रसिद्ध झाल्या, असा दावा फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रहिताचा कायम विचार करणारे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांच्या मनात या विषयाबाबत गैरसमज राहू नये, म्हणून आपण सविस्तर माहिती देत असल्याचेही त्यांनी म्हटले.
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76 टक्के कंपन्या ‘डिफंक्ट’ श्रेणीतील आहेत. म्हणजेच या कंपन्या प्रत्यक्षात कार्यरतच झाल्या नव्हत्या. केंद्र सरकारकडून संसदेत किंवा माहिती अधिकाराच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या माहितीचे ठराविक स्वरूप असते आणि सभागृहात त्यावर चर्चा झाल्यास अधिक तपशील समोर येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीविषयक माहिती पारदर्शकपणे उपलब्ध असल्याचे सांगत त्यांनी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर संपूर्ण आकडेवारी पाहता येत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्र देशात उद्योगांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता आणि पुढेही राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Chakan MIDC | चाकणमधील समस्या सोडवण्यासाठी सरकारचा आराखडा :
माध्यमांमध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणावर बंद होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने वस्तुस्थिती समजण्यासाठी फडणवीस यांनी देशातील कंपन्यांची आकडेवारीही मांडली. देशात 31 लाखांहून अधिक कंपन्या नोंदणीकृत असून त्यापैकी जवळपास 21 लाख कंपन्या सध्या सक्रिय आहेत. 2015-16 मध्ये देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 होती. ही संख्या आता 21,17,747 वर पोहोचली आहे. म्हणजे मागील दहा वर्षांच्या कालावधीत सक्रिय कंपन्यांची संख्या तिपटीपेक्षा अधिक वाढल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच 3 जून 2026 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक 3,96,211 कंपन्या आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये 2,72,342 आणि उत्तर प्रदेशमध्ये 1,85,982 कंपन्या आहेत. कोविडचा कालावधी वगळता देशात दरवर्षी साधारण 20 ते 22 हजार कंपन्या बंद होतात. यामध्ये 76 टक्के डिफंक्ट कंपन्या, 12 टक्के अमालगमेशन अर्थात कंपन्यांचे एकत्रिकरण आणि 2 टक्के विसर्जित कंपन्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
2019-20 मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने विशेष मोहीम राबवत तब्बल 6 लाख कंपन्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय बंद होण्यापेक्षा निष्क्रिय कंपन्या ‘स्ट्राइक ऑफ’ करण्याची संख्या अधिक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.






