Wife Kidnaps Her Own Husband | मुंबई पुन्हा एकदा एका धक्कादायक पण तितक्याच गुंतागुंतीच्या घटनेमुळे चर्चेत आली आहे. एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणाची बातमी पसरताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली. पण पोलिस तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे या घटनेमागचं सत्य उलगडत गेलं आणि ते सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून गेलं.
चार जणांनी घरात घुसून केले अपहरण :
ही गोष्ट आहे वर्सोवा येथे राहणाऱ्या बांधकाम व्यवसायिक चंद्रकांत भुनु यांची. काही दिवसांपूर्वी रात्री अचानक त्यांच्या घरात चार जण घुसले आणि कोणतंही कारण न सांगता त्यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवलं. घरात उपस्थित असलेल्या त्यांच्या दुसऱ्या पत्नीने, अफसाना अरब हिने, हे अपहरण असल्याचं समजून तत्काळ पोलिसात तक्रार नोंदवली. शहरभर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली, पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि प्रकरणावर कामाला लागले. (Wife Kidnaps Her Own Husband)
तपास जसजसा पुढे गेला तसतसं समोर आलं की, भुनु यांचं अपहरण कुण्या गुन्हेगारांनी नव्हे, तर एका रिहॅबिलिटेशन सेंटरच्या (Rehabilitation Center) कर्मचार्यांनीच केलं होतं. आणि हे कर्मचारी कोणी पाठवले होते? तर भुनु यांच्या पहिल्या पत्नीने. पहिल्या पत्नीचं म्हणणं असं होतं की, भुनु यांना दारूचे गंभीर व्यसन लागले होते आणि त्यांना त्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी तिने हे पाऊल उचललं. तिच्या म्हणण्यानुसार, हे सगळं त्यांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी केलं गेलं होतं.
Wife Kidnaps Her Own Husband | मालमत्तेवरून कुटुंबात वाद :
भुनु यांच्या दोन पत्नी आहेत – पहिली पत्नी, जिला आपल्या नवऱ्याच्या व्यसनाची काळजी होती आणि दुसरी पत्नी, अफसाना, जिला ही सगळी कारवाई अपहरणासारखी वाटली. या दोघींमध्ये आणि भुनु यांच्यामध्ये मालमत्तेवरून सतत वाद सुरू असल्याचंही पोलिस तपासात उघड झालं.
पोलिसांनी शोध घेत अखेरीस पालघर येथील एका शांत रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये भुनु यांना शोधून काढलं. तिथे ते स्वतः उपचार घेत होते आणि उपचार घेण्यासही सहमत होते. हे पाहून पोलिसही काही काळ गोंधळले. कारण जे प्रकरण सुरुवातीला अपहरणासारखं वाटत होतं, ते प्रत्यक्षात एक कौटुंबिक आणि भावनिक उपाय ठरलं. या घटनेमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
पोलिस सध्या तपास करत आहेत :
एकीकडे हा प्रसंग कुटुंबातील मतभेद आणि गैरसमज दाखवतो, तर दुसरीकडे तो एक पत्नी आपल्या नवऱ्याला व्यसनातून वाचवण्यासाठी किती टोकाचं पाऊल उचलू शकते हेही दाखवतो. पोलिस सध्या या प्रकरणातील सर्व कर्मचार्यांचा आणि घटनेतील भूमिकांचा तपास करत आहेत.
अपहरणाच्या नावाखाली सुरु झालेलं हे प्रकरण शेवटी व्यसनमुक्ती आणि कौटुंबिक नात्यांतील संघर्षाची एक वेगळीच कहाणी बनली आहे. जीथे हेतू चांगला असला, तरी त्याची पद्धत इतकी गोंधळलेली होती की, तिने संपूर्ण शहराला हादरवून सोडलं.






