Sahar Shaikh | ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर अनेक तरुण चेहरे चर्चेत आले असून त्यामध्ये मुंब्रा परिसरातून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख (Sahar Shaikh) यांचे नाव विशेष गाजत आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे. ‘कसं हरवलं…’ असे म्हणत त्यांनी विरोधकांना आव्हान दिल्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
ठाणे महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 30 मधून सहर शेख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकांमध्ये ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात महिला नगरसेविका निवडून आल्या असून त्यामध्ये सहर शेख या सर्वाधिक चर्चेत असलेल्या तरुण नगरसेविकांपैकी एक ठरल्या आहेत. हिजाब परिधान करणाऱ्या सहर शेख यांच्या आत्मविश्वासपूर्ण शैलीने आणि आक्रमक भाषणामुळे त्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आल्या आहेत.
‘संपूर्ण मुंब्रा हिरवा रंगवायचाय’ विधानामुळे चर्चा :
व्हायरल झालेल्या भाषणात सहर शेख म्हणाल्या की, “आम्हाला कोणाच्या वरदहस्ताची गरज नाही. आम्ही फक्त आणि फक्त अल्लाहचे मोहताज आहोत. ज्यांना वाटत होतं की आम्ही त्यांच्या आधारावर उभे आहोत, त्यांचा अहंकार आम्ही मातीमोल केला आहे.” पुढे बोलताना त्यांनी, “पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक झाली, तर संपूर्ण मुंब्रा असा हिरवा रंगवायचा आहे की या लोकांना इथून पराभव पत्करूनच परत जावं लागेल,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. (Thane Municipal Election)
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून समर्थकांकडून त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले जात आहे, तर विरोधकांकडून टीकाही होत आहे. विशेष म्हणजे, सहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून केलेल्या विधानामुळे हा व्हिडीओ अधिकच व्हायरल झाला आहे. त्यामुळे सहर शेख या नावाची सध्या राज्यभर चर्चा होत आहे.
Sahar Shaikh | कोण आहेत सहर शेख? जाणून घ्या सविस्तर :
सहर शेख या ठाण्यातील मुंब्रा परिसरातील रहिवासी असून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव युनूस शेख असून त्यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुलीसाठी तिकीट मागितले होते. मात्र तिकीट नाकारल्यानंतर सहर शेख यांनी AIMIM पक्षाकडून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे त्या परिसरातील तरुणांमध्ये प्रेरणास्थान ठरत आहेत.(Who Is Sahar Shaikh)
सहर शेख सोशल मीडियावरही अत्यंत सक्रिय असून त्यांचे इन्स्टाग्रामवर सुमारे 3 लाख 40 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या पोस्ट्स, व्हिडीओ आणि वक्तव्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. निवडणुकीतील विजयानंतर त्यांच्या वडिलांनीही थेट जितेंद्र आव्हाड यांना इशारा देत, “कोणाच्याही मुलीच्या भविष्यासोबत खेळू नका, नाहीतर जनता एकत्र येऊन कशी विकेट पाडते ते पाहिलं ना,” असे सांगितले.






