Ajit Pawar Death | महाराष्ट्राच्या राजकारणात गेली चार दशके प्रभाव गाजवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. सकाळी सुमारे 9 वाजता विमान लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात शोककळा पसरली असून पवार कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही तीव्र भावना उमटताना दिसत आहेत. (Ajit Pawar Death)
राजकारणातील कठीण प्रसंगातही संयम राखणारे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी हा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला आहे. आपल्या लाडक्या पुतण्याच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची बातमी कळताच पवार कुटुंबीयांमध्ये शोकाचे वातावरण पसरले असून मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक नेते आणि कार्यकर्ते भावूक झाले आहेत.
शरद पवार कुठे होते? :
अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी समोर आली तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुंबईतील आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी होते. मागील काही काळापासून वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून काहीसे दूर आहेत. मात्र ही दुःखद बातमी समजताच त्यांनी तातडीने बारामतीकडे जाण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेचा धक्का संपूर्ण पवार कुटुंबाला बसला असून कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. शरद पवार यांच्यासह अनेक नातेवाईक, पक्ष नेते आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावूक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
Ajit Pawar Death | दिल्लीतील कुटुंबीयही तातडीने रवाना :
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत होत्या. अपघाताची बातमी समजताच त्या तातडीने पुण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. कुटुंबीयांसह संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही या घटनेचा मोठा आघात झाला असून पक्ष कार्यालयांमध्ये शोकसभा आयोजित केल्या जात आहेत.
अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अर्थमंत्रीसह अनेक महत्त्वाची खाती सांभाळली होती. सलग अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून सिंचन, जलसंपदा, नियोजन आणि वित्त क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या काही निर्णयांवरून वाद झाले असले तरी प्रशासकीय पकड असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.






