विराट कोहली- गौतम गंभीरमध्ये अबोला? अखेर टीम इंडियाच्या कोचने सोडलं मौन; सांगितलं नेमकं सत्य

On: July 17, 2026 10:35 AM
Virat Kohli Gautam Gambhir
---Advertisement---

Virat Kohli-Gautam Gambhir | टीम इंडियाचा इंग्लंड दौरा सुरू असताना मैदानावरील खेळाइतक्याच एका वेगळ्या चर्चेने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. सराव सत्रात विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर एकमेकांशी बोलताना दिसले नाहीत, असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आणि त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा मतभेद झाल्याच्या चर्चांना उधाण आले. सोशल मीडियावरही या विषयावर अनेक तर्क-वितर्क लावले गेले. मात्र, या सर्व अफवांवर आता टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत सत्य काय आहे, याचा खुलासा केला आहे.

कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कोटक यांना विराट आणि गौतम गंभीर यांच्यातील कथित दुराव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हसत उत्तर दिले, “विराट आणि गौतम आजच किमान 10 वेळा एकमेकांशी बोलले आहेत. त्यांना संवाद साधण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही.” त्यांच्या या उत्तरानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

‘ड्रेसिंग रूममधील वातावरण अतिशय सकारात्मक’

कोटक यांनी पुढे सांगितले की, विराट आणि गंभीर यांच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. ड्रेसिंग रूममधील वातावरण अतिशय सकारात्मक असून संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांशी सातत्याने संवाद साधत आहेत. “अशा आधारहीन अफवा नेमक्या कुठून येतात, हेच समजत नाही,” असेही ते म्हणाले.

मैदानातूनच गंभीर यांच्यापर्यंत पोहोचवला महत्त्वाचा संदेश

अफवांना उत्तर देताना कोटक यांनी कार्डिफ वनडेतील एक महत्त्वाचा प्रसंगही सांगितला. विराट कोहली फलंदाजी करत असताना त्याने मैदानातूनच ड्रेसिंग रूममध्ये आणि गौतम गंभीर यांच्यापर्यंत खेळपट्टीबाबत महत्त्वाची माहिती पोहोचवली होती. कार्डिफची खेळपट्टी संथ असून शॉर्ट-पिच चेंडू सहज बॅटवर येत नसल्याचे विराटने संदेशातून सांगितले होते. त्यामुळे सामन्यादरम्यान दोघांमध्ये सतत संवाद सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पराभव झाला, पण विराटची खेळी ठरली लक्षवेधी

मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. मात्र, विराट कोहलीने 66 चेंडूत 65 धावांची संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या खेळीत 8 चौकारांचा समावेश होता. विराट क्रीजवर असताना भारत मोठी धावसंख्या उभारेल, असे चित्र होते. मात्र, त्याच्या बाद झाल्यानंतर मधल्या फळीला मोठी भागीदारी उभारता आली नाही आणि भारताचा डाव अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्येवर आटोपला.

या निकालानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. त्यामुळे आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’चा ठरणार असून, सर्वांचे लक्ष त्या लढतीकडे लागले आहे.

News Title: Virat Kohli Gautam Gambhir Cold War Rumors Busted

Join WhatsApp Group

Join Now