Swargate case l स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) अद्याप फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप त्याला अटक न झाल्याने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी सरकार आणि पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“आरोपीला तातडीने अटक करा, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ!” :
तृप्ती देसाई यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “सरकार आरोपीच्या आत्मसमर्पणाची वाट पाहत आहे का? आम्हाला जबरदस्तीने अटक करता, पण आरोपीसाठी मात्र वेगळा न्याय का? जर लवकरच त्याला अटक झाली नाही, तर आम्ही कायदा हातात घेऊ!”
पोलिसांच्या निष्क्रियतेवर निशाणा साधत त्या पुढे म्हणाल्या, “राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली जातात. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरण असो किंवा स्वारगेट प्रकरण, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? लाखोंच्या पगारावर पोलीस बसलेत, पण साधा आरोपी सापडत नाही! जर पोलिसांना हे जमणार नसेल, तर आरोपी आमच्या ताब्यात द्या, आम्ही निकाल लावतो.”
Swargate case l सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवर तृप्ती देसाईंचा हल्लाबोल :
या प्रकरणात सरकार आणि पोलीस प्रशासन पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप करत तृप्ती देसाई म्हणाल्या, “५० तास उलटले तरी आरोपी सापडत नाही. आम्ही गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांना याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला भेटू दिलं नाही. पोलिसांनी आम्हालाच ताब्यात घेतलं. याचा अर्थ सरकार नागरिकांचे प्रश्न ऐकण्यास तयार नाही.”
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर संतप्त होत त्या म्हणाल्या, “आज पुण्यात महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आरोपी मोकाट फिरतोय आणि सरकार केवळ आश्वासनं देतंय. जर पोलीस आणि सरकारने वेळेत पावलं उचलली नाहीत, तर आम्ही अधिक आक्रमक भूमिका घेऊ.”
या संपूर्ण प्रकरणामुळे महिला सुरक्षा आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.






