Thane Water Cut l ठाणे शहरातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात मंगळवारी रात्रीपर्यंत (24 तास) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. MIDC जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात पाणीबाणी – कारण काय? :
मागील काही दिवसांपासून ठाण्यातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. विशेषतः घोडबंदर, वर्तक नगर आणि समता नगर येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच, स्टेम प्राधिकरणाच्या वीजपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे पंपिंग ठप्प झाले, त्यामुळे पाणी उचलण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला.
जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, सोमवारी रात्री 12 वाजेपासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Thane Water Cut l ठाणेकरांनी काय काळजी घ्यावी? :
– पाणी साठवून ठेवा: 24 तास पुरेल एवढा साठा करून ठेवा.
– अनावश्यक पाणी वापर टाळा: गाड्या धुणे, मोठ्या प्रमाणात कपडे धुणे यासारख्या गोष्टी टाळा.
– पाणी टँकरसाठी महापालिकेशी संपर्क साधा: कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागात तातडीने टँकर सेवा उपलब्ध करून दिली जाईल.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या ठाणे शहरासाठी मुबलक पाणीसाठा आहे आणि कोणत्याही प्राधिकरणाकडून पाणीकपातीच्या सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे ठाण्यात पाणीकपात लागू करण्यात आलेली नाही. मात्र, काही भागांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक कामांमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.






