Navi Mumbai Crime | तळोजा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका किरकोळ वादातून तीन वर्षांच्या चिमुकलीचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमागील कारणे समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
खेळण्यांवरील वादाने घेतले भयंकर रूप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद अन्सारीच्या पत्नीचे आणि मृत मुलीच्या आईचे मुलांच्या खेळण्यांवरून वाद झाले होते. सुरुवातीला हा वाद साधा वाटत असला, तरी तो पुढे गंभीर स्वरूप धारण करेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. रागाच्या भरात आणि सूडाच्या भावनेने अन्सारीने त्या निरागस मुलीचा जीव घेतला आहे.
हत्या केल्यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह घरातील बॅगेत भरून टॉयलेटमध्ये लपवला होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांना फोन करून त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. त्याने मुलीला परत मिळवण्यासाठी खंडणीची मागणीही केली. मात्र, मुलीचे वडील अमरीश शर्मा यांनी या संदर्भात तातडीने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
असा झाला गुन्ह्याचा उलगडा
पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला असता, मोहम्मद अन्सारीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. अधिक चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की, अन्सारीला ऑनलाईन गेम्स खेळण्याचे व्यसन होते आणि त्याने या गेम्ससाठी तब्बल ४०,००० रुपये खर्च केले होते. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता आणि त्यातूनच त्याने हे भयानक कृत्य केल्याचे उघड झाले.
परिसरात भीतीचे वातावरण, नागरिकांमध्ये संताप
या निर्घृण हत्येमुळे तळोजा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निरपराध चिमुकलीच्या मृत्यूनंतर नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी स्थानिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सामील आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.






