Sugar Price Hike l यंदाच्या हंगामात देशातील साखर उत्पादन घटण्याचे संकेत मिळत असल्याने साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, मिठाई, बिस्कीट, शीतपेये यांसारखे साखरयुक्त पदार्थ महाग होऊ शकतात. भारताला दरवर्षी सुमारे 280 लाख टन साखरेची गरज असते, मात्र यंदाच्या हंगामात उत्पादन केवळ 259 लाख टन राहील, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने वर्तवला आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) उत्पादन 264 लाख टन, तर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (AISTA) 258 लाख टन राहील, असे भाकीत केले आहे.
हंगामाच्या सुरुवातीला ISMA ने 333 लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार, केंद्र सरकारने 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली, त्यापैकी ५ लाख टनाहून अधिक साखर निर्यातही झाली. मात्र, हंगाम जसजसा पुढे गेला, तसतसे उत्पादन कमी होण्याच्या शक्यता स्पष्ट झाल्या. त्यामुळे देशांतर्गत साखर पुरवठ्यावर ताण येऊ शकतो आणि साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे.
ऊस उत्पादन घटण्यामागील मुख्य कारणे:
यंदा ऊस उत्पादनावर प्रतिकूल हवामानाचा मोठा परिणाम झाला आहे. उत्तर प्रदेशातील CO-0238 वाणाच्या उसाला ‘रेड रॉट’ आणि ‘टॉप शूट बोरर’ या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अकाली फुलोऱ्याचा परिणाम झाला. परिणामी, साखर उतारा कमी झाला आणि एकूण उत्पादन घटले.
ऊस पूर्णपणे विकसित न झाल्याने तो गाळपासाठी योग्य प्रमाणात उपलब्ध झाला नाही. अशा परिस्थितीत साखर कारखान्यांचे गाळप हंगाम कमी झाला, ज्याचा परिणाम साखर उत्पादनावर दिसून येतो.
Sugar Price Hike l साखर कारखान्यांवर आर्थिक संकट :
गाळप हंगाम कमी राहिल्याने देशभरातील साखर कारखान्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात जवळपास 200 साखर कारखाने कार्यरत असून, त्यांच्यासाठी यंदाचा हंगाम अत्यंत कठीण ठरला आहे.
यंदाचा गाळप हंगाम केवळ 83 दिवस चालला, जो साधारणपणे 140-150 दिवसांचा असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादन केवळ 80 लाख टन राहणार आहे. साखर कारखान्यांचे 365 दिवसांचे खर्च असूनही गाळप हंगाम कमी असल्याने आर्थिक तोटा वाढण्याची भीती आहे.






