Rohit Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. त्यांच्या जाण्याला आठवडाही उलटलेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) च्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू झाल्याने वातावरण संवेदनशील बनले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.
अपघातानंतरची राजकीय उलथापालथ :
२८ जानेवारी रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांचे खासगी चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर (Baramati Airport) उतरण्याच्या काही मिनिटे आधी कोसळले. या दुर्घटनेत अजितदादांसह विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाला. या घटनेने पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला असून, अजूनही अनेकांना हा विश्वास बसत नाही की अजित पवार आपल्यात नाहीत. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
या दु:खातून राज्य सावरत असतानाच राजकारणात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणावर दावे-प्रतिदावे होत असून, या चर्चांना आणखी धार मिळाली आहे. अजित पवार हयात असताना नेमक्या कोणत्या चर्चा झाल्या होत्या, त्यांनी कोणाशी संवाद साधला होता आणि कोणाला काय सांगितले होते, यावर वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. यामुळे वातावरण अधिकच अस्वस्थ झाले आहे.
Rohit Pawar | सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि रोहित पवारांची प्रतिक्रिया :
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या निर्णयावरही राजकीय वर्तुळातून टीका झाली. याच दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दोन मुद्द्यांवर भाष्य केले. १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार होते, असा दावा त्यांनी केला. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, असेही ते म्हणाले. या वक्तव्यांनंतर दिवसभरात मोठ्या घडामोडी घडताना दिसून आल्या.
आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 4, 2026
या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र भावना व्यक्त केल्या. “आजचं राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद झालं आहे. या राजकारणात माणसाच्या जीवाची किंमत शून्य झाली आहे. छक्के-पंजे करता येणं हाच निकष असेल, तर चांगल्या माणसाने खरंच राजकारणात राहावं का, असा प्रश्न पडतो,” असे त्यांनी लिहिले. अजितदादांच्या निधनानंतर रोहित पवार खचलेले दिसले होते, मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला. तसेच, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी (Pinky Mali) यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला, असेही समोर आले आहे.






