Banking News | देशातील बँक ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या काही महिन्यांपासून नियमभंग करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई तर काही बँकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आरबीआयने देशातील एका आघाडीच्या खासगी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. (Kotak Mahindra Bank Fine)
मध्यवर्ती बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर तब्बल 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या तपासात बँकेकडून बँकिंग नियमांचे पालन करण्यात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळेच ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयने का ठोठावला दंड? :
आरबीआयच्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा बँकेने ‘बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट’ (BSBDA) संदर्भातील महत्त्वाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. नियमांनुसार विशिष्ट श्रेणीतील ग्राहकाला केवळ एकच बीएसबीडी खाते ठेवण्याची परवानगी असते. मात्र, तपासात एका ग्राहकाच्या नावावर एकापेक्षा अधिक बीएसबीडी खाती उघडल्याचे आढळून आले.
बीएसबीडी खाते ही आर्थिक समावेशनासाठी अत्यंत महत्त्वाची योजना असल्याने हा नियमभंग गंभीर मानला जातो. याशिवाय बँकेने आपल्या बिझनेस कॉरस्पॉन्डेंट्सना (BC) त्यांच्या अधिकृत कार्यक्षेत्राबाहेर काम करण्यास परवानगी दिल्याचेही आरबीआयच्या तपासात समोर आले आहे.
Banking News | ग्राहकांवर काय परिणाम होणार? :
तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली असून, बँकेकडून काही कर्जदारांची चुकीची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना पाठवण्यात आली होती. चुकीच्या माहितीद्वारे ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर आणि आर्थिक विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते, त्यामुळे हा मुद्दा आरबीआयसाठी अधिक संवेदनशील ठरला.
कारवाईपूर्वी आरबीआयने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि बँकेने त्यावर उत्तरही दिले. मात्र बँकेचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने बँकिंग रेग्युलेशन कायदा कलम 47A(1)(c) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (नियमन) कायदा, 2005 अंतर्गत दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्राहकांवर कोणताही थेट नकारात्मक परिणाम होणार नाही :
दरम्यान, या कारवाईचा बँक ग्राहकांवर कोणताही थेट नकारात्मक परिणाम होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ग्राहकांचे पैसे, ठेवी, एफडी, कर्ज व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू राहतील, असेही केंद्रीय बँकेने सांगितले आहे. (Kotak Mahindra Bank Fine)
एकूणच, बँकिंग क्षेत्रातील शिस्त, पारदर्शकता आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आरबीआय कोणतीही तडजोड करणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. नियमभंग करणारी बँक कितीही मोठी असली तरी कडक कारवाई अटळच, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.






