Pune Traffic Diversion | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त पुणे शहरात आज उत्सवी वातावरण पाहायला मिळत आहे. विविध भागांतून भव्य शोभायात्रा आणि मिरवणुका निघणार असल्याने नागरिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन करत अनेक रस्त्यांवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Shiv Jayanti 2026)
पुण्यातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर निर्बंध :
मिरवणुकांचा मुख्य मार्ग मध्यवर्ती पेठांमधून जाणार असल्यामुळे लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि कुमठेकर रस्ता या महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी कमी होईपर्यंत हे बदल कायम राहतील, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. (Pune Traffic Diversion)
शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना जंगली महाराज रस्ता, स. गो. बर्वे चौक आणि टिळक रस्ता या पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गणेश रस्त्यावरून जिजामाता चौकाच्या दिशेने जाणारी वाहतूक दारूवाला पूलमार्गे वळवण्यात आली आहे. केळकर रस्त्यावरून आप्पा बळवंत चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर मार्गाने पाठवले जाणार आहे. तसेच लक्ष्मी रस्त्यावर गरजेनुसार वाहतूक वळवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Pune Traffic Diversion | हिंजवडी आयटी हबमध्ये विशेष नियोजन :
हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) परिसरातही मोठी वर्दळ लक्षात घेऊन स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. कस्तुरी चौक (Kasturi chowk) ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करणे आवश्यक राहणार आहे.
मारुंजी वाय जंक्शनकडून कस्तुरी चौकाकडे येणाऱ्या वाहनांना आता उजवीकडे वळून विनोदे वस्ती आणि इंडियन ऑईल चौक मार्गे पुढे जावे लागेल. मेझा-9 चौकाकडून हिंजवडी गावठाणच्या दिशेने जाणारी वाहने इंडियन ऑईल चौक आणि विनोदे वस्तीमार्गे मार्गक्रमण करतील. तसेच मेझा-9 चौकातून शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेनपैकी डावी लेन बंद ठेवण्यात आली असून वाहतूक फक्त उजव्या लेनवरून सुरू राहील. शहरात सकाळी 7 पासून लागू केलेले हे तात्पुरते बदल परिस्थितीनुसार बदलू शकतात. मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात आणि नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.






