Pune Sambhajinagar Expressway | पुणेकर आणि मराठवाड्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे – छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग प्रकल्प सध्या निधीअभावी अडकलेला आहे. तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प गतवर्षी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता, परंतु जवळपास दहा महिने उलटल्यानंतरही भूसंपादनासाठी आवश्यक निधीची तरतूद झालेली नाही.
या महामार्गामुळे पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांमधील प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मात्र प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी गरजेची असलेली २,५०० कोटी रुपयांची निधी अद्याप राखीव ठेवलेली नाही, ज्यामुळे संपूर्ण प्रकल्प रखडला आहे. (Pune Sambhajinagar Expressway)
३१ महिने लोटले तरी निधी नाही :
या प्रकल्पासाठी ३१ महिन्यांपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना – 3(A) जाहीर करण्यात आली होती. यानंतर झाल्टा येथे माती परीक्षण करून राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने केंद्र सरकारच्या संबंधित विभागाला अहवाल सादर केला. मात्र आजवर निधीचा निर्णय घेतलेला नाही.
यासाठी पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या तीनही जिल्ह्यांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासह राज्य पायाभूत महामंडळाने संयुक्तरित्या काम करण्याचे नियोजन असूनही निधीच्या अभावामुळे प्रगती शून्य आहे.
Pune Sambhajinagar Expressway | सध्याच्या मार्गाचे नूतनीकरणही प्रस्तावित :
दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे – शिरूर – अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे नूतनीकरण करण्याचीही योजना सादर करण्यात आली आहे. यामुळे प्रवास अधिक सुरळीत आणि वेगवान होईल असा शासनाचा दावा आहे. मात्र मुख्य नव्या महामार्गाच्या कामात विलंब झाल्यास संपूर्ण नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Pune Sambhajinagar Expressway)
या महामार्गाच्या पूर्णतेनंतर दळणवळण व्यवस्था सुलभ, प्रवासाचा वेळ कमी आणि आर्थिक गती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर निधीची तरतूद करून प्रकल्पाला गती देण्याची मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि तज्ज्ञांकडून होत आहे.






